मंगळवार, २२ जुलै, २०२५

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका/Role of money power in Indian Politics

 

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका-भारतीय लोकशाही प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा वापर ही सर्वसामान्य बाब बनलेली आहे.  भारतीय राजकारणात पैशाची ताकद महत्वपूर्ण भूमिका निभावत असते. भारतीय राजकारणावर पैशाच्या ताकदीचा वाढता प्रभाव लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घातक मानला जात आहे. निवडणुकीत पैशांच्या केल्या जाणाऱ्या मुक्त वापरामुळे निवडणूक खर्चाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने निवडणुका प्रचंड खर्चिक बनलेल्या आहेत.  निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अधिकृत मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त पैसा निवडणूक सभा दौरे, रॅली, जाहिराती यांच्यावर खर्च केला जातो आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर केला जातो. 

    भारतातील राजकीय पक्षांकडून तिकीट वाटप करताना उमेदवाराची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन उमेदवारी बहाल केली जाते. निवडणुकीच्या रिंगणात विजयी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार पैशाचा वापर करतात. मतदारांना प्रभावित करण्यासाठी रोख रक्कम किंवा भेटवस्तू दिल्या जातात. भारतीय राजकारणात पैशांचा वापर निवडणूक प्रचार आणि उमेदवार निवडी पुरता मर्यादित नाही तर शासनाच्या धोरण आखणीवर देखील त्याचा प्रभाव पडत असतो. निवडणुकीतील वाढता खर्च भरून काढण्यासाठी राजकीय पक्ष मोठमोठ्या कार्पोरेट संस्था, भांडवलदार यांच्याकडून देणग्या घेत असतात. भांडवलदारांकडून मिळणाऱ्या मोठ्या देणग्यांमुळे राजकीय पक्ष त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या असतात. त्यामुळे सत्ता आल्यानंतर त्यांच्या ही त्याला अनुकूल परवानगी, कर सवलती, लायसन्स दिले जातात. सत्ताधारी आणि मोठ्या पक्षांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. लहान पक्षांना देणग्या मिळत नसल्यामुळे ते अनेकदा निवडणुकीच्या राजकारणातून हद्दपार होतात. निवडणुकीत देखील श्रीमंत उमेदवारांना राजकीय पक्षाकडून तिकिटे बहाल केली जातात. शासकीय पातळीवर धोरण आखणी करताना सामान्य माणसांच्या प्रश्नाला प्राधान्य मिळण्याऐवजी निवडणुकीत पैसे पुरवणाऱ्या उद्योग समूहांच्या मागण्यांना प्राधान्य दिले जाते. निवडणुकांमध्ये केल्या जाणाऱ्या पैशाच्या वापरामुळे सामान्य माणसांचा आवाज दाबला जातो. भारतीय राजकारणात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होतो. कारण तो आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून मतदारांना प्रभावित करत असतो. आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवारांची निवडणूक जिंकण्याची क्षमता पैशाच्या वापरामुळे कमी होते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर वाढल्यामुळे भारतीय लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराचे देखील प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. कारण निवडणूक काळात केला जाणारा खर्च वसूल करण्यासाठी प्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला उत्तेजन दिले जात असते. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने जमा केलेल्या पैशाचा वापर केला जात असतो. त्यामुळे निवडणुका  ह्या बेकायदेशीर पैशाला अधिकृतता प्राप्त करून देणाऱ्या ठरतात.

निवडणुकीत पैशाच्या ताकदीच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक निवडणूक सुधारणा करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्याची ऑनलाइन पारदर्शक पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे आहे. निवडणूक खर्चावर आयोगाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा जास्त निवडणूक खर्च करणाऱ्या उमेदवारास निवडणूक लढवण्यास बंदी आणली पाहिजे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. निवडणुकीत पैसे वाटप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण पैशाचा वापर ही भारतीय लोकशाहीतील प्रमुख समस्या बनलेले आहे. या वापराला रोखण्यासाठी मजबूत कायदे, नियंत्रण ठेवणाऱ्या प्रभावी संस्था, माध्यमे आणि नागरिकांची जागरूकता यांच्या साह्याने या समस्येवर मात करून भारतीय लोकशाहीला सक्षम बनवता येईल.

भारतीय लोकशाहीवरील राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाहीचा प्रभाव

 

भारतीय लोकशाहीवरील राजकीय वंशवाद किंवा राजकीय घराणेशाहीचा प्रभाव 

            राजकीय वंशवाद म्हणजे एकाच परिवारातील अनेक सदस्य राजे करण्यात विविध पदावर असणे होय‌. लोकशाहीत वंशवादाला कोणती स्थान नसते. परंतु भारताच्या राजकारणावर वंशवादाचा पगडा दिसून येतो. 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकीमध्ये राजकीय वंशवादाचा बोलबाला दिसून येते. भारतात एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती मोठा नेता बनल्यानंतर त्या नेत्याच्या वारसा बाकी सदस्यांना आपोआप प्राप्त होतो. त्या वारशाच्या जोरावर वर्षानुवर्ष सत्ता भोगत असतात. उदा. पंडित नेहरूंच्या वारसाच्या आघराणेशाहीवादाचे प्राबल्य दिसून येते. भारतात लोकशाही शासन व्यवस्थेनुसार निवडणुकीच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जात असले तरी प्रत्यक्षात भारतातील काही मोजक्या घराण्यांच्या ताब्यात सत्ता असल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व दीर्घकाळ गांधी घराण्यातल्या लोकांनी केलेले दिसून येते. काँग्रेसच्या वंशवादाला विरोध करणाऱ्या लालूप्रसाद यादव,  मुलायमसिंग यादव, शरद पवार आणि इतर प्रादेशिक पक्षाने कितीही विरोध केलेला असला तरी जवळपास बहुसंख्य प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाने घराणेशाहीचा स्वीकार केलेला दिसतो. त्यामुळे भारताच्या राजकारणावर मोजक्याच कुटुंबाची पकड दिसून येते.

स्थानिक ते राष्ट्रीय राजकारणात वारसांचे राजकारण हे प्रमुख वैशिष्ट्य बनलेले आहे. महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय उमेदवारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी दिसून येते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 542 पैकी 162 म्हणजे जवळपास 30 टक्के खासदार राजकीय घराणेशाहीतून पुढे आलेले दिसून येतात. अमेरिकाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि जर्मनीच्या मैनहेम युनिव्हर्सिटीच्या संशोधकाद्वारे संकलित आकडेवारीनुसार भारतातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राजकीय वंशवाद सामान्य गोष्ट आहे असा निष्कर्ष काढला आहे. राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर राजकीय वंशवादाचे प्रमाण राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त दिसून आलेले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 543 पैकी 156 खासदार हे राजकीय घराणेशाहीच्या पार्श्वभूमीतून आलेले दिसून येतात. भाजप सारख्या राजकीय वंशवादाला विरोध करणाऱ्या पक्षात देखील वरच्या पातळीवर घराणेशाहीतून आलेले सदस्य कमी दिसत असले तरी राज्य पातळीवरील आणि स्थानिक राजकारणात भाजपमध्ये देखील घराणेशाहीचा बोलबाला दिसून येतो.

भारतात राजकीय वंशवाद वाढीची कारणे-

1.       व्यक्तीपूजा वृत्ती- भारतीय समाजात असलेल्या व्यक्तीपूजाच्या तत्वामुळे भारतात राजकीय वंशवादाचा विकास झालेला दिसून येतो.

2.       सरंजामशाही सामाजिक संरचना आणि मानसिकता- भारतीय राजकारणातील सरंजामशाही सामाजिक संरचना आणि येथील लोकांच्या सरंजामशाही मानसिकतेमुळे राजकीय वंशवादाच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे.

3.       राजकीय परिवार प्रयत्न- राजकीय परिवाराच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेत राजकीय वंशवाद टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून झालेल्या प्रयत्नांमधून देखील या वृत्तीला चालना मिळालेली दिसते. कारण अनेक नेते आपल्या मुलांना इतर व्यवसायात पाठवण्याऐवजी राजकारणात पाठवणे योग्य मानतात.

4.       राजकीय पक्ष लोकशाही तत्त्व अभाव- राजकीय पक्षांच्या अंतर्गत रचनेत लोकशाही तत्वाचा अभाव आहे. राजकीय पक्षांमध्ये निवडणुकांऐवजी नेमणुकीच्या तत्वाला राजकीय वंशवादाच्या तत्वाला चालना मिळते.

5.        राजकीय भ्रष्टाचार आणि निवडणुका खर्चिक- वडणुका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांकडून निवडणुका लढवणे अशक्य बनते याचा फायदा उचलून राजकीय घराणेशाही आपला प्रभाव निर्माण करत असते.

6.       पक्ष नेतृत्व- राजकीय पक्षाचे नेतृत्व विशिष्ट घराण्याकडे असल्यामुळे देखील राजकीय वंशवादाला त्यांना मिळालेली दिसून येते.

7.       संस्थावर प्राबल्य- घराणेशाही असलेल्या नेतृत्वाकडे असलेले संस्थात्मक आणि आर्थिक प्राबल्यामुळे त्यांना नेतृत्व करण्याची लवकर संधी प्राप्त होते. उदा. महाराष्ट्रात सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था असलेल्या नेत्यांच्या मुलांकडेच पुढे नेतृत्व आलेले दिसते.  

8.       जनतेची मानसिकता- भारतीय जनते देखील राजकीय वंशवादाला अनुकूल असलेल्या वृत्तीमुळे राजकीय वंशवादाला पोषक वातावरण निर्माण झालेले दिसून येते.

वरील कारणामुळे भारतात राजकीय वंशवादाचा विकास झालेला आहे.

राजकीय वंशवादाचे लोकशाही वरील परिणाम-

1.       राजकीय वंशवादामुळे देश हितापेक्षा परिवार हिताला जास्त महत्त्व दिले जाते. लोकशाही यंत्रणा परिवाराच्या भल्यासाठी वापरली जाते.

2.       वंशवादी राजकारण लोकशाहीची मधील स्पर्धा नष्ट करून मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.

3.       वंशवादी राजकारण दरबारी संस्कृतीला जन्म देत असते. या संस्कृतीत परिवाराची सेवा आणि गुणगाणाला महत्त्व असते. परिवाराची सेवा चाकरी करणाऱ्यांना पदे बहाल केली जातात.

4.       वंशवादी राजकारणामुळे योग्यतेच्या आधारावर नव्हे तर विशिष्ट परिवारात जन्म झाला याच्या आधारावर राजकीय पद मिळतात. . लोकशाहीतील समान संधीच्या सिद्धांताला राजकीय वंशवादा मुळे अडथळा निर्माण होतो.

5.       राजकीय वंशवाद लोकतंत्राला मजबूत होऊ देत नाही. राजकीय वंशवादामुळे प्रतिभा संपन्न लोकांना राजकीय पद मिळण्याऐवजी विशिष्ट घराण्यातील लोकांना सातत्याने पदे मिळत जातात. त्यामुळे लोकशाही विशिष्ट कुटुंबाची मक्तेदारी बनत असते.

6.        राजकारणातील वंशवाद देशातील लोकशाही प्रधान संस्थांना कमजोर बनवण्याचा प्रयत्न करत असते.

7.       राजकीय घराणेशाहीच्या माध्यमातून व्यक्तीवाद आणि व्यक्तीपूजेला प्रोत्साहन मिळते. व्यक्तीपूजा ही लोकशाहीला मारक आहे. राजकीय वंशवादामुळे पात्रतावान लोकांना योग्य संधी प्राप्त होत नाही.

8.       राजकीय वंशवादामुळे राजकारणात एकाधिकारशाही विकसित होते. एकाच कुटुंबातील लोकांकडे अनेक राजकीय पद प्राप्त होतात. परिणामतः घराणेशाही ही नव नेतृत्व निर्माण करण्याच्या कार्यात अडथळे निर्माण करते. घराणेशाहीतील राजकीय नेतृत्व स्थानिक पातळीवर नव नेतृत्व निर्माण होऊ देत नाही,  त्यांच्या नेतृत्वाचे खच्चीकरण केले जाते किंवा दुय्यम पदे देऊन त्यांच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातात. राजकीय वंशवादामुळे सत्तेच्या राजकारणात मर्यादित लोकांना सत्ता प्राप्त होत असल्याने त्यांची सत्तेवर मक्तेदारी निर्माण होते.

राजकीय वंशवादावर नियंत्रण उपाय- राजकीय वंशवादाचा आधार न घेता स्वकर्तुत्वावर नेतृत्व प्रस्थापित केलेले अनेक लोक भारतात दिसून येतात. परंतु एकंदरीत राजकारणाचा विचार करता त्यांची संख्या खूपच कमी दिसून येते. राजकीय वंशवादाला लगाम लावल्याशिवाय दुसऱ्या लोकांना संधी मिळणार नाही. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीच्या आधारावर व्यक्तींचे मोजमाप करण्याऐवजी गुणवत्तेच्या आधारावर मोजमाप केल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेची संधी प्राप्त होईल.

1.       समाजातील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील संस्थांमधील राजकीय वंशवादाची मक्तेदारी नष्ट केल्याशिवाय घराणेशाहीला चाप बसणार नाही. कारण या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्या भांडवलाच्या जोरावर हा वर्ग इतरांपेक्षा लवकर सत्ता प्राप्त करत असतो.

2.       भारतीय राजकारणातील घराणेशाही किंवा वंशवाद नष्ट करण्यासाठी भारतीय राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या अंतर्गत लोकतंत्राची स्थापना केली पाहिजे.

3.       भारतीय जनता जोपर्यंत सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत बनत नाही तोपर्यंत राजकीय वंशवादाच्या विरोधात होणाऱ्या लढायला यश प्राप्त होणार नाही.

4.       राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या परिवारातील सदस्यांना पदे बहाल न केल्यास राजकीय वंशवादावर मात करता येईल.

अशा पद्धतीने राजकीय वंशवाद ही भारतीय लोकशाहीतील प्रमुख समस्या मानले जाते. या समस्येचे योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी आवश्यक राजकीय सुधारणा घडून आणल्यास ह्या समस्येचे निराकरण करता येईल.     राजकीय परिवारातील पुढील पिढीने राजकारणात येणे चुकीचे नाही. परंतु घराणेशाहीच्या आधारावर नव्हे तर आपले गुण कौशल्य आणि कार्याच्या आधारावर नेतृत्वासाठी दावा केल्यास राजकीय वंशवादाचा प्रश्न निकाली काढता येईल.

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका/Role of money power in Indian Politics

  भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका- भारतीय लोकशाही प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा वापर ही सर्वसामान्य बाब बनलेली आहे.   भारतीय राजकारणात ...